
बीड जिल्ह्यातील केज येथील विलास घुले यांच्या हत्याप्रकरणाने आता एक वेगळेच आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या हत्याकांडात पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत अवघ्या दोन दिवसांत एकूण ९ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि चाकूही जप्त केला आहे. या संवेदनशील प्रकरणात बीड पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून परिस्थिती हाताळली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परंतु, या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत बीड जिल्ह्यात मोठे राजकीय नाट्य आणि ‘झुंडशाही’चा प्रकार घडवून आणल्याचा आरोप आता केला जात आहे.
पीडित महिलेचा खुलासा: हत्येचे कारण समोर
काल पीडित महिलेने स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उघड केला. ही हत्या कोणत्याही राजकीय वैरातून किंवा पूर्वनियोजित कटामुळे झालेली नाही. “अनैतिक संबंध” आणि त्यातून उद्भवलेल्या वादातून आधी आरोपींवर जीवघेणा हल्ला झाला आणि या वादाचा शेवट विलास घुले यांच्या दुर्दैवी हत्येने झाला, असे पीडित महिलेच्या खुलाशानंतर स्पष्ट झाले आहे.
खासदारांच्या मुलाला गोवण्याचा ‘केविलवाणा प्रयत्न’ फसला?
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, या वैयक्तिक वादातील हत्येचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्याचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांना या प्रकरणात टार्गेट करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचा आरोप होत आहे.
“हत्या प्रकरणातील ९ आरोपी सुटले तरी चालतील, पण खासदार सोनवणे यांचा मुलगा यात अडकला पाहिजे,” अशा ईर्षेने काही घटक पेटले होते. अखेर, प्रशासनाला वेठीस धरून आंदोल शांत करण्यासाठी सौरभ सोनवणे यांचे नाव गुन्ह्याच्या पुरवणी यादीत घेण्यात आले, तेव्हा कुठे ही आग थंडावली. परंतु, हा ‘केविलवाणा प्रयत्न’ पूर्णपणे फसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.



