Uncategorized
सुंदर ते ध्यान, भ्रष्टाचारावर मन! केजमध्ये ‘विकासा’च्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ; कानडी रोडच्या नव्या पुलाला २ दिवसांतच भगदाड
असा विकास नको, जीवदान द्या! २५ खेड्यांची जीवनवाहिनी असलेला पूल ४८ तासांत खचला

‘विकासा’च्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ; नव्या पुलाला दोनच दिवसांत पडले भगदाड
केज (विशेष प्रतिनिधी):
केज शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या आणि तब्बल २५ हून अधिक खेड्यांचा मुख्य संपर्क मार्ग असलेल्या कानडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामात लाचखोरी आणि निकृष्ट कामाचा कळस पाहायला मिळत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासन आणि गुत्तेदारांच्या संगनमताने केलेल्या या कामाचे पितळ अवघ्या दोन दिवसांत उघडे पडले असून, नव्याने टाकलेल्या स्लॅबला तब्बल चार फुटांचे भगदाड पडले आहे.
२५ गावांची जीवनवाहिनी धोक्यात
हा रस्ता म्हणजे कानडी, साबला, धर्माळा, तरनळी, मैदवाडी, कोल्हेवाडी, लव्हूरी, येवता, जिवाचीवाडी, विडा, काशीदवाडी, गप्पेवाडी, नामेवाडी, कावळेवाडी, नागझरी, घाटेवाडी, शिंदी यांसह परिसरातील अनेक गावांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सतत एसटी बसेस, हायवा, ट्रॅक्टर आणि जड वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावरील नाली व पुलाचे काम करताना सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.
लाकडे, पत्रे आणि १० एमएमचे गज; असा हा ‘दर्जेदार’ विकास!
चार फुटांच्या नालीवर पूल बांधताना निलगिरीची लाकडे आणि पत्रे टाकून त्यावर नावापुरते १० एमएमचे लोखंडी गज फुटा-फुटाच्या अंतरावर अंथरण्यात आले. सिमेंट-काँक्रीटचा दर्जा इतका निकृष्ट होता की, काम पूर्ण होऊन दोन दिवसही उलटले नाहीत तोच पुलाच्या मधोमध भलेमोठे भगदाड पडले. सुदैवाने एखादे जड वाहन किंवा प्रवाशांची बस खड्ड्यात कोसळून मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, अशा प्रकारचा जीवघेणा विकास करून गुत्तेदार आणि संबंधित अधिकारी जनतेवर कसले उपकार करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
आडबाजूच्या कामांची काय अवस्था असेल?
मुख्य रस्त्यावर भरदिवसा आणि लोकांच्या डोळ्यांसमोर जर इतक्या उघडपणे निकृष्ट दर्जाचे काम करून सरकारी पैशांची लूट केली जात असेल, तर आडबाजूला किंवा ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामांमध्ये किती मोठा गैरव्यवहार सुरू असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.



