तर बीडचे मणिपूर होईल खा. रजनी पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

केज:-राज्यसभेच्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी काश्मीरमधील स्थिति विषयी आणि गृह मंत्रालयाच्या असमाधानकारक कामगिरीवर देखील तीव्र शब्दात टीका केली व सरकारला धारेवर धरले.
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश पुन्हा उघड झाले. वेळीच आरोपींवर कारवाई झाली नाही, तर बीड जिल्हा आणि महाराष्ट्राचे मणिपूर होण्यास वेळ लागणार नाही, असे एका स्थानिक शेतकऱ्याने काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवेळी सांगितले,’ असा अनुभव सांगताना काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभेत मराठीतून केलेल्या १० मिनिटांच्या भाषणात पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत असल्याचे केंद्र सरकार वारंवार सांगत आहे. मग काश्मीरमधील सुरक्षेसाठी यंदाच्या ४१ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद का करावी लागली? मोदी सरकारने काश्मिरी पंडितांचा वापर केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला आहे. त्यांना मदत न करता त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचे आणि त्याबद्दल फक्त बोलण्याचे काम त्यांनी केले आहे,’ असे टीकास्त्र रजनी पाटील यांनी सोडले.
‘२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठी २ लाख ३३ हजार २११ कोटींची तरतूद करूनही या मंत्रालयाची कामगिरी असमाधानकारक आहे. निमलष्करी दलांत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आत्महत्या, मानसिक ताण, निवृत्तीआधीच राजीनामा देण्याचे प्रमाण वाढत आहे. सीआरपपीएफमध्ये नऊ टक्के कमी मनुष्यबळ आहे. या दलांच्या आधुनिकीकरणासाठी ४,०६९ कोटींची तरतूद केली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत ९० टक्के अनुदानवाटप झालेले नाही. नारी शक्ती वंदन चा गवगवा करणाऱ्या या सरकारच्या काळात निमलष्करी दलांमध्ये महिला कर्मचा-यांचे प्रमाण फक्त चार टक्के आहे,’ असे रजनी पाटील म्हणाल्या. काँग्रेसकडून पाटील यांना २० मिनिटांचा वेळ बोलण्यासाठी देण्यात आला होता. मात्र आधीच्या वक्त्यांचे भाषण लांबल्याने पाटील यांना फक्त सात ते आठ मिनिटे मिळाली. भाषण घाईघाईने वाचताना पाटील यांना खोकल्याची जबरदस्त उबळ आली. ते पाहून ज्येष्ठ सदस्या सुधा मूर्ती या भाजपच्या बाकावरून पुढे आल्या आणि त्यांना पाण्याची बाटली दिली. घरी जाताना पाटील यांनी आभार मानल्यावर मूर्ती यांनी, ‘पक्षाचा इथे काय संबंध?’ अडचणीत आपणच मदत करायची असते,’ असे सांगितले.



