राजकारण

सत्तेच्या तुकड्यावर डोलणारी निष्ठा! बुडत्या जहाजातून उड्या मारणारे ‘उंदीर’ कुणाचेच नसतात

संकट काळात पक्षाने उमेदवारी दिली, निवडून येताच खासदारांनी वैयक्तिक विकासासाठी पलटी मारली!

 

मुंबई:-उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर हजारो आक्षेप घेता येतील, पण संकट काळात पक्षाला लाथ मारून पळणारे नेते हे बुडत्या जहाजातून उड्या मारणाऱ्या उंदरांपेक्षा वेगळे नाहीत, हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे आजचे विदारक वास्तव आहे. ज्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी राजकीय पुनर्जीवन दिले, ज्यांना मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर काढून खासदारकीच्या खुर्चीवर बसवले, तेच नेते आज सत्तेच्या आणि लाभाच्या मोहापायी ‘पदर फाडून’ पळाले आहेत.
उपकाराची परतफेड अपकाराने! ‘या’ नेत्यांची बदललेली निष्ठा
पक्षाने ज्यांना फक्त देण्याचे काम केले, त्यांनी ऐन मोक्याच्या क्षणी पक्षाला ‘खो’ दिला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या या नेत्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर मतदारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे:
संजय दिना पाटील: शरद पवारांच्या एका शब्दावर ठाकरेंनी तिकीट दिले. राजकीय करिअर संपत आलेले असताना मुंबईतून खासदार झाले आणि पुनर्जीवन मिळताच त्यांनी पलटी मारली.
बंडू जाधव (बंडू बॉस): परभणीत त्यांच्याविरोधात प्रचंड नकारात्मक वातावरण असतानाही ‘निष्ठावान’ म्हणून ठाकरेंनी उमेदवारी दिली. मराठवाड्यातील जातीय समीकरणात ते निवडून आले, पण शेवटी त्यांनीही पाठ फिरवली.
ओमराजे निंबाळकर: वडिलांच्या हत्येनंतर ज्यांना ठाकरे कुटुंबाने संपूर्ण राजकीय ताकद दिली, आमदार-खासदार केले, ते ओमराजे ‘उद्धव ठाकरेशी कशी नजर मिळवू?’ असे म्हणायचे. पण आज परिस्थिती अशी आहे की, मीडियाला तोंड देण्याच्या भीतीने विमानतळाच्या लाऊंजमध्ये ३ तास लपून त्यांना आडमार्गाने पळ काढावा लागला.
भाऊसाहेब वाकचौरे: ऐन निवडणुकीत शिर्डीत आले, तिकीट मिळवले, साईबाबांची शपथ घेतली आणि निवडून आल्यावर ती शपथही हवेत विरली.
आष्टेकर आणि देशमुख: आष्टेकरांनी ‘बायकोच्या निधनानंतर ठाकरे सांत्वनाला आले नाहीत’ हे हास्यास्पद कारण पुढे करून पक्ष सोडला, पण त्यांचा मुलगा मात्र महाविकास आघाडीसोबतच आहे! तर देशमुख नावाचे खासदार बारा गावचे पाणी पिऊन पक्षात आले आणि खासदार होताच पळ काढला.
मतदारांशी प्रतारणा: भाजपमधील ‘आयाराम-गयारामांना’ पायघड्या
आज बहुतांश लोकप्रतिनिधींचा ओढा भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडे असण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘सत्ता आणि आर्थिक लाभ’. मतदारांनी या लोकांना व्यक्ती म्हणून नव्हे, तर पक्ष आणि विचारधारेला पाहून मतदान केले होते. आज या फुटीरांमुळे मतदारांची घोर फसवणूक झाली आहे.

निष्ठावंतांची कीव!
भाजप आज बाहेरून येणाऱ्या बंडखोरांना थेट मोठी पदे देऊन पायघड्या अंथरत आहे. पण या ‘होलेसेल तोडफोडीच्या’ भाऊगर्दीत, पक्षासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या जुन्या आणि संघर्ष करणाऱ्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांची मात्र मोठी कीव येत आहे.

अटलजींचा कायदा निकामी; ‘शब्दाला जागणारी’ माणसे संपली!
एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्या काळात पक्ष हरला तरी संघटनेतले लोक हलत नव्हते. अटळजींनी पक्षांतर बंदी कायदा कडक केला होता, पण आज तो कायदाही निकामी ठरला आहे. सत्तेची सावली आणि स्वतःचा आर्थिक विकास यापलीकडे लोकप्रतिनिधींना काहीही दिसत नाही.
थोडक्यात काय तर…
आज बाकीचे पक्ष जात्यात आहेत आणि सत्तेत असलेले सुपात आहेत. पण राजकारणाचा चष्मा बाजूला ठेवून पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट होते—”सत्ता पाहून पळणारे हे उंदीर कुणाचेच नसतात!” मतदारांना गृहीत धरणाऱ्या या दुटप्पी नेत्यांना जनता येणाऱ्या काळात कशी धूळ चारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button