Uncategorized
देशाच्या विकासावर बोलायला दम नाही, म्हणून नेहरू-गांधींवर रोज नवी चिखलफेक!
देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली वाचाळवीरांचा धुमाकूळ; जनहिताचे प्रश्न सोडून फक्त गलिच्छ राजकारण!
स्वातंत्र्यलढ्यात आणि आधुनिक भारताच्या उभारणीत आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर सध्या सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने अत्यंत खालच्या भाषेत आणि विकृत पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, गिरीष महाजन, गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखी अनेक बरीच मंडळी या चिखलफेकीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मूळ मुद्द्यांवरून आणि स्वतःच्या अपयशावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच हा सगळा भयानक प्रकार सुरू असल्याचा तीव्र संताप सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कुठे पंडित नेहरू… कुठे हे वाचाळवीर?
पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला, आयआयटी (IIT), आयआयएम (IIMS), इस्रो (ISRO) आणि भाभा अणुशक्ती केंद्रासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था देशात उभ्या केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक स्वतंत्र आणि सार्वभौम ओळख निर्माण केली. अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याची तुलना आजचे गल्लीबोळातील नेते अत्यंत हीन पातळीवर जाऊन करताना दिसतात.
राजकारणात सुसंस्कृतपणाचे दाखले देणारे नेते जेव्हा जाहीर सभांमधून किंवा समाजमाध्यमांवरून या महान नेत्यांचा उल्लेख एकेरी किंवा अपमानकारक शब्दांत करतात, तेव्हा लोकशाहीतील वैचारिक दिवाळखोरी चव्हाट्यावर येते. ही निव्वळ राजकीय टीका नसून स्वतःची राजकीय पापं आणि अपयश लपवण्यासाठी चालवलेला हा एक सुनियोजित अजेंडा आहे, असा आरोप आता थेटपणे केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली
२०१४ पासून देशात भाजपचे मोदी सरकार आल्यानंतर, जनतेला मोठ्या विकासाची आणि ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवण्यात आली होती. सरकारने जर केवळ देशाच्या आर्थिक विकासावर, रोजगार निर्मितीवर, गरिबी निर्मूलनावर आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रामाणिकपणे भर दिला असता, तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा एका वेगळ्याच उंचीवर असती.
परंतु, गेल्या काही वर्षांत विकासाच्या गप्पा मारणारे हेच सरकार आणि त्यांचे नेते देशांतर्गत पातळीवर मात्र इतिहास बदलण्यात आणि दिवंगत नेत्यांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा भारताच्या संसदेतील किंवा राजकीय नेत्यांच्या अशा विधानांकडे पाहिले जाते, तेव्हा लोकशाहीचा डोलारा कमकुवत होत असल्याचे चित्र जगासमोर जाते, जे अत्यंत वेदनादायी आहे.
स्वतःची पापं लपवण्याचा भयानक प्रकार
आज देशासमोर आणि विशेषतः महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर समस्या आ वासून उभ्या आहेत. शेतकरी आत्महत्या, रखडलेले पायाभूत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचाराचे जाळे आणि वाढती बेरोजगारी यांवर सरकारकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. जेव्हा-जेव्हा जनता किंवा विरोधी पक्ष सरकारला या अपयशावर जाब विचारतात, तेव्हा-तेव्हा भाजपच्या गोटातून पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा गांधी घराण्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करून जुने विषय उकरून काढले जातात.
जनतेचा संतप्त सवाल:
इतिहास हा बदलता येत नाही आणि महापुरुषांचे योगदानही पुसून टाकता येत नाही. सत्तेच्या सुंदोपसुंदीत मश्गूल असलेल्या या नेत्यांना सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करायला वेळ कधी मिळणार? दिवंगत नेत्यांवर टीका करून स्वतःचे अपयश झाकण्याचा हा भयानक प्रकार सुजाण महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही



