Uncategorized

अविनाश पाठकचा ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाहूणचार केल्यानंतर बीड नंतर धाराशिव मधील महामार्ग भूसंपादन घोटाळ्याचे धक्कादायक खुलासे!

बीड भूसंपादन घोटाळा उघडकीस आल्यावर धाराशिव चा भूसंपादन घोटाळा उघडकीस

धाराशिव:-बीड जिल्ह्यातील तब्बल ७३ कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात अटक झालेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी अविनाश पाठक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (तुरुंगवास) सुनावली आहे. पाठकांच्या या तुरुंगवासामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाठक यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत असून, धाराशिव येथील त्यांच्या कार्यकाळातील एका मोठ्या जमीन भूसंपादन प्रकरणाची चर्चा आता जिल्ह्यात तीव्र झाली आहे.
तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि भूसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, शासकीय प्रकल्पाची गोपनीय माहिती आधीच लीक केली. त्यानंतर स्वतःचे पती आणि नातेवाइकांच्या नावे कवडीमोलाने जमिनी खरेदी करून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा भूसंपादन मावेजा लाटल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे.
अवघ्या काही महिन्यांत झाले ‘लखपती’!
हा सगळा काळाबाजार धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणात घडला आहे. सध्या लातूर येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि तत्कालीन भूसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी आपल्या पदाचा पुरेपूर ‘वापर’ केला.
• करमरकर पॅटर्न: शिल्पा करमरकर यांचे पती उमेश उणकल (सोलापूर) आणि त्यांचे नाशिक येथील सीए पंकज देशपांडे यांनी मार्च २०१६ मध्ये ताकविकी येथील गट क्रमांक १७३ मध्ये ८३ आर जमीन अवघ्या १९ लाख रुपयांत खरेदी केली.
• ‘तो’ अचानक आलेला योग: जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत, म्हणजेच सप्टेंबर महिन्यात त्याच जमिनीचे भूसंपादन झाले. त्यात १७ गुंठे जमीन संपादित झाली आणि त्यांना तब्बल ४६ लाख रुपयांचा मावेजा देण्यात आला. अवघ्या काही महिन्यांत ही मंडळी ‘लखपती’ झाली.
जिल्हाधिकारी पाठकांचाही ‘पाहुणचार’
शिल्पा करमरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
• पाठक यांचे नातलग आणि मित्र सुमेध पाठक, प्रणव पाठक (तुळजापूर), व्यंकटेश देशमुख आणि कृष्णा देशमुख (मुंढवा, पुणे) यांनी ताकविकी शिवारातच गट क्र. १७२ मध्ये २ हेक्टर २ ९ आर जमीन अवघ्या १० लाख ९० हजारांत खरेदी केली.
• या जमिनीतील १८ गुंठे जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाली आणि त्यांना तब्बल ४९ लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला

अजब योगायोग: प्रशासकीय कार्यालयात एकत्र काम करणाऱ्या पाठक आणि करमरकर यांच्या ताकविकी येथील खरेदी केलेल्या जमिनी अगदी शेजारी-शेजारी (गट क्र. १७२ आणि १७३) आहेत. दोघांचेही समान क्षेत्राच्या आसपास भूसंपादन झाले. ‘तिथेच जमीन घ्यावी म्हणजे मोठा लाभ मिळेल’ हा दोघांनाही आलेला स्वप्नवत दृष्टांत म्हणजे केवळ एक ‘योगायोग’ म्हणावा की पूर्वनियोजित कट, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांचा अजब युक्तिवाद: ‘संधी मिळाली तर गुंतवणूक करू नये का?’
हे प्रकरण जेव्हा सुरुवातीला चर्चेत आले, तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावर तात्काळ लेखी खुलासा मागवला होता. मात्र, नंतर हे प्रकरण पद्धतशीरपणे दाबण्यात आले.
त्यावेळी यावर पडदा टाकताना अधिकाऱ्यांनी अजब युक्तिवाद केले होते:
• अविनाश पाठक: “ते खरेदीदार माझे दूरचे नातेवाईक आहेत, माझा या खरेदीशी थेट संबंध नाही,” असे सांगत त्यांनी हात वर केले होते.
• शिल्पा करमरकर: “आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. गुंतवणूक करण्याची संधी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी गुंतवणूक करू नये का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता.
• उमेश उणकल (पती): “हा सगळा पैसा व्हाईट मनी असून त्याचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये केला आहे,” असा पवित्रा त्यांनी माध्यमांसमोर घेतला होता.
प्रश्न उरतो तो नैतिकतेचा: संधी आल्यावर गुंतवणूक जरूर करावी, पण ती संधी सर्वसामान्य शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, पदाचा दुरुपयोग करून आणि शासकीय गोपनीयतेचा भंग करून मिळवली असेल, तर त्याला ‘गुंतवणूक’ म्हणावे की ‘अधिकृत दरोडा’? या महामार्ग भूसंपादनाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
७ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता तुरुंगाची हवा!
बीड जिल्ह्यातील सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या ७३ कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात अविनाश पाठक मुख्य आरोपी आहेत. १५४ प्रकरणांमधील वाढीव मोबदला तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांनी नियमबाह्य पद्धतीने वाढवण्यात आल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर आणि व्यंकटराम यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असून, पाठकांचा लॅपटॉप आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. गेल्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत मिळालेले महत्त्वाचे पुरावे आज पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी अविनाश पाठक यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) रवानगी करण्याचा आदेश दिला आहे. आता पाठकांना जामीन मिळतो की त्यांना पुढील काही दिवस तुरुंगातच काढावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button