Uncategorized
परळीतील ‘गुंडशाही’ संपवण्यासाठी अखेर वीज प्रकल्पच केला बंद ! मूठभर गुंडांच्या पापात शेकडो प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त!
अदानीशी करार, महानिर्मितीला धक्का; परळीतील वाढती गुंडशाही संपवण्यासाठी अखेर वीज प्रकल्पच बंद?

मुंबई:-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) अदानी पॉवरकडून वीज खरेदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या ‘महानिर्मिती’ला मोठा धक्का बसला आहे. या करारामुळे महानिर्मितीचे राज्यभरातील १,६०० मेगावॉट क्षमता असलेले आठ औष्णिक वीज संच कायमचे बंद होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे हजारो कंत्राटी व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आली असून, वीज क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका करार काय आहे?
महावितरणने राज्यात वीज पुरवठ्यासाठी स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेमध्ये अदानी पॉवरने सर्वात कमी म्हणजे रु. ५.३० प्रति युनिट हा दर सादर केला होता. अदानी पॉवरचा हा दर सर्वात किफायतशीर ठरल्याचे सांगत, महावितरणने त्यांच्याकडून १,६०० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) अधिकृत मंजुरी दिली आहे.
बंद होणारे ‘महानिर्मिती’चे ८ औष्णिक संच कुठले?
अदानी समूहाकडून १,६०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार असल्याने, महानिर्मितीचे तितक्याच क्षमतेचे खालील जुने आणि मध्यम संच टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत:
नाशिक (एकलहरे) औष्णिक वीज केंद्र: संच क्र. ३ (२१० मेगावॅट)
नाशिक (एकलहरे) औष्णिक वीज केंद्र: संच क्र. ४ (२१० मेगावॅट)
नाशिक (एकलहरे) औष्णिक वीज केंद्र: संच क्र. ५ (२१० मेगावॅट)
भुसावळ (दीपनगर) औष्णिक वीज केंद्र: संच क्र. ३ (२१० मेगावॅट)
चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र: संच क्र. १ (२१० मेगावॅट)
चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र: संच क्र. २ (२१० मेगावॅट)
खापरखेडा औष्णिक वीज केंद्र: संच क्र. १ (२१० मेगावॅट)
परळी औष्णिक वीज केंद्र: संच क्र. ३ (२१० मेगावॅट)
महानिर्मितीने आक्षेप न नोंदवल्याने आश्चर्य!
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, जेव्हा हा प्रस्ताव वीज आयोगासमोर सुनावणीसाठी आला, तेव्हा ‘महानिर्मिती’ व्यवस्थापनाने यावर कुठलाही आक्षेप किंवा हरकत नोंदवली नाही. आपल्याच हक्काचे वीज संच बंद होत असताना सरकारी कंपनीने घेतलेल्या या मूक भूमिकेमुळे वीज तज्ज्ञांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
परळी प्रकल्पातील दहशत आणि स्थानिक चर्चा
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, बंद करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधील स्थानिक परिस्थितीचीही मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः परळीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये गेल्या काही काळात गुंडांची दहशत प्रचंड प्रमाणात वाढली होती. ही वाढलेली गुंडशाही आणि दहशत संपवण्यासाठीच अखेर शासनाने हा औष्णिक वीज प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला, अशीही एक चर्चा आता समोर येत आहे. येथील काही मूठभर लोकांच्या अशा कृत्यांमुळे अखेर शेकडो प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या अन्नात माती कालवली गेली आहे, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.
हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट व संघटनांचा इशारा
हे आठ वीज संच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने तिथे काम करणाऱ्या हजारो कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामुळे कामगार संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून सोशल मीडियावरही या निर्णयाचा तीव्र निषेध केला जात आहे.
“सरकारी वीज कंपन्यांना पद्धतशीरपणे कमकुवत करून खाजगी भांडवलदारांना फायदा पोहोचवण्याचा हा डाव आहे. जर कामगारांना बेरोजगार केले, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा वीज कर्मचारी संघटनांनी दिला आहे.



