Uncategorized
कृषी खात्यावर गाजवला इंगा, मग तहसीलसमोरील अतिक्रमणांवर मेहेरबानी का? केज प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराविरुद्ध जनतेत तीव्र संताप!
केज प्रशासनाचा 'अंधेर नगरी चौपट राजा' कारभार; तहसीलसमोरील बस थांबा बनला 'खाऊ गल्ली', कारवाईत मात्र उघड पक्षपातीपणा!
केज:-येथील तहसील कार्यालयासमोर प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या बस थांब्याला चक्क खाऊ गल्लीचे स्वरूप आले आहे. या बस थांब्याच्या थेट आत आणि आजूबाजूला खाद्यपदार्थांचे गाडे थाटण्यात आले असून, यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. शासकीय जागेत आणि त्यातही बस थांब्यासारख्या अत्यंत संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या उघड अतिक्रमणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील प्रशासनाचा पक्षपातीपणाही आता जनतेच्या चांगलाच डोळ्यात भरू लागला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
तहसील कार्यालयासमोर प्रवाशांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बस थांब्यावर सध्या ‘वैष्णवी भेळ, पाणीपुरी व कचोरी सेंटर’ तसेच शेजारीच ‘अध्यक्ष पान शॉप’ नावाचे दुकान थाटण्यात आले आहे. बस थांब्याच्या शेडचा वापर थेट व्यावसायिक गाड्यांचे संरक्षण म्हणून केला जात असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी खाद्यप्रेमींची गर्दी होत असल्याने आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त लावली जात असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.
प्रवाशांचे हाल; महिला व वृद्धांची कोंडी
तालुक्यातून विविध शासकीय कामांसाठी येणारे ग्रामीण नागरिक, महिला, वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थी एसटी बसची वाट पाहत या थांब्यावर थांबतात. मात्र, थांब्याच्या मूळ जागेवरच खाद्यपदार्थांचे गाडे आणि व्यावसायिक साहित्य ठेवल्यामुळे प्रवाशांना या कडक उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे. त्यातच या अतिक्रमणामुळे थांब्याची स्वच्छता पूर्णपणे नाहीशी झाली असून, तिथे कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
“प्रवाशांच्या सुविधेसाठी शासनाने लाखो रुपये खर्चून बस थांबे उभारले आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या थांब्यांवर दुकानदारांनी ताबा मिळवला आहे. आम्ही बसची वाट पाहत उभे कुठे राहायचे?”
— एक त्रस्त प्रवासी



