Uncategorized
शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पाठक-करमरकर जोडीवर ओढले कडक ताशेरे!
शासकीय तिजोरीवर दरोडा! नागपूर-रत्नागिरी हायवे भूसंपादन घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांचे काळे कारनामे उघड; पोलिसांना चौकशीचे आदेश!

धाराशिव:-नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि भूसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात (मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ) याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश धाराशिव पोलिसांना दिले आहेत.
नेमका घोटाळा काय आहे?
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया २७ मार्च २०१४ रोजी सुरू झाली होती आणि २६ ऑक्टोबर २०१५ रोजी केंद्र सरकारच्या राजपत्रात ३(अ) ची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. नियमानुसार या काळात संबंधित जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर कायदेशीर प्रतिबंध असतात.
असे असतानाही, तत्कालीन भूसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर आणि अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, संगनमताने एक मोठा कट रचला. या प्रकल्पाची कोणतीही माहिती नसलेल्या गरीब शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्यात आल्या आणि अवघ्या काही महिन्यांतच स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे कोट्यवधी रुपयांचा मोबदला (मावेजा) लाटला.
नातेवाइकांच्या नावे लाटलेला मोबदला:
शिल्पा करमरकर: यांनी आपले पती उमेश पांडुरंग उणकल (सोलापूर) आणि नाशिक येथील सीए पंकज व्यंकटराव देशपांडे यांच्या नावे १ फेब्रुवारी २०१६ रोजी ताकविकी गावातील गट क्र. १७३ मध्ये ८३ आर जमीन अवघ्या १९ लाख रुपयांत खरेदी केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यातील १७ गुंठे जमीन संपादित दाखवून ४६ लाख रुपयांचा मावेजा पदरात पाडून घेतला.
अविनाश पाठक: यांच्या सुमेध पाठक, प्रणव पाठक (तुळजापूर) आणि व्यंकटेश व कृष्णा देशमुख (पुणे) या नातेवाइकांच्या नावे १८ मार्च २०१६ रोजी ताकविकी शिवारातील गट क्र. १७२ मध्ये २ हेक्टर २९ आर जमीन १० लाख ९० हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. त्यातील १८ गुंठे जमिनीचे संपादन दाखवून ४९ लाख रुपयांचा मोबदला लाटण्यात आला.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कोर्टाची चपराक
या महाघोटाळ्याच्या संदर्भात २३ जानेवारी २०१८ रोजी अंबादास बाळासाहेब व्हराडे यांनी धाराशिवच्या तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रशासकीय दबावामुळे किंवा राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. अखेर न्याय मिळवण्यासाठी याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागेले.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या या सुस्त कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. कोर्टाने स्पष्ट केले की,
“शेतकऱ्यांचे शोषण आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या अशा गंभीर प्रकरणांकडे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करू शकत नाही.”



