
भारत देशातील वक्फ बोर्ड हा तिसरा सर्वात मोठा जमीन मालक म्हणून ओळखला जातो. डिसेंबर २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार वक्फ बोर्डाकडे सुमारे 8 लाख 72 हजार (8,72,000) नोंदणीकृत स्थावर मालमत्ता आहेत. विविध अहवालांनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीची एकूण जमीन 9 लाख 40 हजार एकरांपेक्षा (9,40,000 एकर) अधिक असण्याचा अंदाज आहे.
या मालमत्तांमध्ये प्रामुख्याने मशिदी, मदरसे, कबस्तान (दफनभूमी) आणि इतर धार्मिक व सामुदायिक वापरासाठी असलेल्या जमिनींचा समावेश होतो. भारतातील वक्फ मालमत्ता मोठ्या प्रमाणावर मुस्लिम शासक, सूफी संत, श्रीमंत व्यापारी आणि धार्मिक नेत्यांनी दान केलेल्या आहेत. या दानशूर व्यक्तींनी मशिदी, दर्गे, मदरसे आणि सामाजिक कल्याणासाठी मोठ्या इस्टेट्स (मोठ्या मालमत्ता) वक्फ केल्या आहेत.
वक्फ म्हणजे काय?
वक्फ बोर्ड इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक किंवा धर्मादाय उद्देशांसाठी राखीव असलेल्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. एकदा कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून नोंदणीकृत झाली की, ती दान करणाऱ्या व्यक्तीकडून थेट अल्लाहला (ईश्वराला) हस्तांतरित होते आणि त्यामुळे ती अपरिवर्तनीय बनते.
‘वक्फ’ हा शब्द मूळ अरबी भाषेतील ‘वक़ुफा’ या शब्दावरून आला आहे. ज्याचा अर्थ ‘देवाच्या नावाने समर्पित केलेली वस्तू’ किंवा ‘लोकांच्या कल्याणासाठी दिलेले धन’ असा होतो. भारतामध्ये वक्फ प्रशासनाला बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये यावर सरकारचे अधिक नियंत्रण आहे. भारतात वक्फ कायदा हा अल्पसंख्याकांच्या हक्कांशी संबंधित आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तो इस्लामिक शासनाचा भाग आहे.
निजामांचा वक्फला मोठे दान
हैदराबादच्या निजामांनी वक्फला सार्वजनिक देणग्या देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘निजाम’ ही उपाधी ‘निजाम-उल-मुल्क’ या शब्दाचा संक्षेप आहे. ज्याचा अर्थ ‘राज्याचा शासक’ असा होतो.
हैदराबादमध्ये एकूण दहा निजाम झाले. पहिले मीर कमरुद्दीन खान (1724-1748) आणि शेवटचे मीर उस्मान अली खान. निजाम-उल-मुल्क आसफ जाह सातवे यांनी दख्खनच्या प्रदेशात हजारो एकर जमीन वक्फला दान केली.



